मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जय्यत तयारी सुरू केली असून, वेगवेगळ्या मुख्य कामांसाठी महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. यांमध्ये महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, नारायण राणे, मंगल प्रभात लोढा आणि विनय सहस्रबुद्धे या सहा जणांचा समावेश आहे. ‘भाजप’च्या केंद्रीय कार्यालयाने लोकसभा निवडणूक अभियानाच्या विविध समित्यांची ही सूची जाहीर केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या जबाबदाऱ्यांसाठी ‘भाजप’ने अनेक समित्या बनवल्या आहेत. त्यात पक्षाचे संकल्पपत्र समितीमध्ये (निवडणूक घोषणापत्र समिती) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मुख्य स्थान मिळाले आहे. राणेंबरोबरच रेल्वे मंत्री पियुष गोयलही संकल्पपत्र समितीमध्ये आहेत. केंद्रीय रस्तावहन मंत्री नितीन गडकरींना सामाजिक व स्वयंसेवी संघटना संपर्क समितीमध्ये, राज्यसभा सांसद विनय सहस्रबुद्धेंना साहित्य निर्माण समितीमध्ये, तर केंद्रीय मनुष्यबळ विकास प्रकाश जावडेकर यांना प्रबुद्ध संमेलन समितीमध्ये घेतले आहे.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा असे एकमेव नेते आहेत ज्यांन दोन समित्यांमध्ये स्थान दिले गेले आहे. लोढा यांना लोकसभा निवडणुकीमध्ये प्रवास व विमान समिती तसेच, लाभार्थी संपर्क समितीमध्ये स्थान मिळाले आहे. या सूचीत माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे नाव भुवया उंचावणारे आहे. ते ‘भाजप’च्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले सांसद आहेत.
‘भाजप’ अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या निवडणूक अभियान संघात राणे, गडकरी, गोयल, जावडेकर, सहस्रबुद्धे आणि लोढा या दिग्गज नेत्यांना लोकसभा निवडणुकीचे व्यवस्थापन, प्रचार व संचालनमध्ये स्थान देऊन ‘भाजप’कडून लोकसभा निवडणुकीची तयारी किती जोरदार सुरू असल्याचे दाखवून दिले आहे.